श्री. शरद गोविंद गांवकर सन्मानिय शरद गांवकर यांची ओळख करून देताना अभिमान वाटतो. समाजबांधवांसमोर त्यांनी खऱ्या अर्थाने आदर्श निर्माण करून तो आदर्श समाजालाच नव्हे तर संपूर्ण देशाला प्रेरणा देणारा आहे. आपल्या शिक्षणाचा, बुद्धीचा, अनुभवाचा फायदा देशासाठी करून देताना शास्त्रज्ञ शरद गांवकर यांनी केलेले कार्य आमच्या नेहमीच स्मरणात राहिले पाहिजे. कारण ती प्रेरणा घेऊनच देशासाठी-समाजासाठी कार्य कसे करावे? त्याचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना नेहमीच होत राहील. भारताचे थोर शास्त्रज्ञ सन्मानिय शरद गोविंद गांवकर यांचा परिचय क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजासाठीच नव्हेतर अखिल विश्वाला होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यांनी केलेले कार्य देशाला नेहमीच सर्वोच्च स्थानी घेऊन जाणारे आहे. त्यांचा आदर्श आपण जपालाच पाहिजे आणि आपल्या पुढील पिढीसमोरही ठेवलाच पाहिजे. त्यांच्यावरील हा लेख दीपस्तंभाप्रमाणे निरंतर प्रेरणा देत राहील! -नरेंद्र हडकर |
सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यात असलेल्या आचरे-गाऊडवाडी हा सन्मानिय शरद गांवकर यांचा गाव.
त्यांचे आई-वडील दादर, मुंबई येथे राहत होते. तेथेच त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गोविंद ठकोजी गांवकर हे नावाजलेले शिक्षक होते. त्यांनी मुलांसाठी अनेक माहितीपर आणि उद्बोधक पुस्तके लिहिली. मराठी भाषेत प्रथमच रंगीत चित्रमय पुस्तके लिहून छापून प्रसिद्ध करून त्यांनी केलेले कार्य त्याकाळात विशेष दखलपात्र होते. कारण छपाईचे तंत्रज्ञान त्यावेळी आजच्यासारखे प्रगत नव्हते. त्यामुळे रंगीत छपाई करणे आर्थिकदृष्टया परवडण्यासारखे नव्हते. तरीही विद्यार्थ्यांसाठी एका आदर्श शिक्षकाने जे कार्य त्यावेळी केले त्याला सलाम करावाच लागेल. अशा घरातील शैक्षणिक वातावरणाचा परिणाम अगदी बालपणापासून शरद गांवकर यांच्या मनावर बुद्धीवर झाला. वडिलांनी कौशल्याने शिकविलेल्या अनेक गणिती तंत्रांमुळे शरद गांवकर यांना विज्ञानाची – गणिताची आवड निर्माण झाली.
त्यांची आई सुद्धा (७५ वर्षांपूर्वीच्या काळात) शिक्षिका होती. आईने शिक्षणाचे महत्व मनावर कायमचे बिंबविले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नसल्याचा धडा त्यांनी आपल्या मुलांना-आपल्या विद्यार्थ्यांना दिला. त्यांची आई अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय काटेकोर आणि कडक होतीच पण याखेरीज अतिशय धडाडीची व धाडसी स्त्री होती. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ती तयार असायची आणि आजूबाजूच्या लोकांना तिचा मोठा आधार होता.
शरद गांवकर यांचे वडील हे स्वतः लेखक तसेच प्रकाशनाच्या व्यवसायामध्ये होते. व्यवसायामधील चढउतारांमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्याबाबत शरद गांवकर सांगतात की,
“मला आठवते कधीकधी शाळेची फी भरण्यासाठी सुद्धा मेटाकुटीची परिस्थिती होती. परंतु आमच्या आई वडिलांच्या ध्येयवादी वृत्तीमुळे आणि संस्कारांमुळे आमचे बालपण एका करारी निर्धारात गुंग होऊन पण त्याचबरोबर अतिशय आनंदी वृत्तीत गेले. आईच्या व्यक्तीमत्त्वाचा माझ्यावर आणि त्यातून माझ्या संशोधनातील यशावरही मोठा अनुकूल परिणाम झाला. माझे वडील बंधू श्री. अरविंद, वहिनी श्रीमती अनुराधा व बहिणी डॉ. शरदिनी शेरेकर आणि श्रीमती मीना लोके यांनी मला सतत प्रोत्साहन दिले व सर्व परिस्थितीत आधार दिला ज्यामुळे मी घडत गेलो.”
शरद गांवकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या सुप्रसिद्ध बालमोहन विद्यामंदिरमध्ये झाले. या शाळेतील शिक्षकांनी त्यांना शिक्षण तर दिलेच पण त्याचबरोबर पुस्तकं वाचण्याचीही मोठी आवड निर्माण केली. शाळेतील वेगवेगळ्या वाचनालयांची पुस्तके त्यांना सहजपणे उपलब्ध व्हायची. सुदैवाने त्यांचे वडीलही स्वतः लेखक असल्याने त्यांच्या घरातही कायम अनेक विषयांच्या पुस्तकांचा संग्रह असायचा.
शरद गांवकर यांना इयत्ता पाचवीपासूनच मिडलस्कूल आणि नंतर हायस्कूल शिष्यवृत्ती त्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्याने मिळाली होती. या दोन शिष्यवृत्त्यांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या वर्गातसुद्धा अनेक हुशार मुले होती. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण स्पर्धेतून अभ्यासाची आवड अधिकाधिक सदृढ होत गेली.
आपल्या शाळेबाबत शरद गांवकर म्हणतात की, “आमच्या शाळेचे वैशिट्य म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड वाढावी म्हणून अनेक उपक्रम राबविले जात. विज्ञान प्रदर्शनात आम्ही काही प्रयोग मांडत असू. शाळेत अनेक प्रकारची प्रदर्शने संपन्न व्हायची. निरनिराळे दगड आणि खनिजांचे प्रकार, विविध शैक्षणिक प्रयोग शाळेत व्हायचे आणि त्याचा फायदा आम्हाला झाला. ते चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर येतं. आमच्या आवडीचा विचार करून रात्री तारे बघण्यासाठी आमच्या शाळेने आम्हाला शाळेची उच्च दर्जाची दुर्बीण घरी सुद्धा न्यायची परवानगी दिली होती. अशा काही गोष्टींचा दूरगामी सकारात्मक परिणाम मुलांच्या मनावर होतो. अर्थात शाळेने दिलेल्या या सवलती आम्हीही अतिशय जबाबदारीने वापरल्या होत्या.”
शैक्षणिक आणि पुढील कारकीर्द:-
एस. एस. सी. परीक्षेनंतर शरद गांवकर यांना राज्य पातळीवर ‘गव्हर्नमेंट ओपन मेरिट शिष्यवृत्ती’ मिळाली. राम नारायण रुईया कॉलेजमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. अखिल भारतीय पातळीवरील लेखी परीक्षा आणि मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यावर नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कीम (N.C.E.R.T. Delhi कडून आयोजित) ही अतिशय प्रतिष्ठेची अखिल भारतीय शिष्यवृत्ती १९६९ मध्ये त्यांना मिळाली. या शिष्यवृत्तीमुळे त्यांना महाविद्यालयात शिकतानाच दरवर्षी भारतातील जोधपूर, विशाखापट्टणम, आय. आय. टी. कानपुर आणि भाभा ऍटोमिक रिसर्च सेन्टर अशा नामांकित विद्यापीठ / संस्थेमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत एक महिना राहून शिकण्याची आणि संशोधन करण्याची संधी मिळाली.
एम. एस. सी. नंतर काही काळ आय. आय. टी. कानपुर व भाभा ऍटोमिक रिसर्च सेन्टर येथे शिक्षण व संशोधन केले. १९७९ मध्ये यु. पी. एस. सी. दिल्लीच्या अखिल भारतीय भूभौतिक परीक्षेत (लेखी आणि मुलाखत) शरद गांवकर सर्व भारतात प्रथम आले. त्यानंतर ते भूभौतिकज्ञ पदावर जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया (जीएसआय) या अखिल भारतीय पातळीवर काम करण्याऱ्या प्रतिष्ठित संस्थेत हैदराबाद येथे १९८० मध्ये रुजू झाले.
भारतातील भूवैज्ञानिक क्षेत्रात काम करणारी जीएसआय ही संस्था भारतातील सर्वात जुन्या आणि नावाजलेल्या केंद्रीय डिपार्टमेंट्स मध्ये मोडते. या संस्थेकडून सर्व प्रकारच्या भूवैज्ञानिक आणि भूभौतिक प्रणालींचा वापर करून पृथ्वीचा अनेक प्रकारे अभ्यास केला जातो. खनिज आणि धातूचे नवीन साठे शोधून काढणे, तसेच भूकंपांची निरीक्षणे घेऊन, त्यांच्या मूळ कारणांचा अभ्यास करून त्याचा नवीन मोठी बांधकामे करताना उपयोगी पडणारे सेईसमिक झोनेशन नकाशे बनविणे, रिमोट सेन्सिंग उपकरणांचा वापर करून तसेच अशाप्रकारे बनवलेल्या नकाशांचा अभ्यास करून पृथ्वीविषयी नवीन शोध लावणे; या सर्व गोष्टी जीएसआयच्या कामांमध्ये मोडतात.
या संस्थेत शरद गांवकर यांनी सतत ३१ वर्षे काम करून भारताच्या विविध भागांमध्ये जवळ जवळ सर्व राज्यांमध्ये जाऊन भूवैज्ञानिक अभ्यास केला. कोळसा, अभ्रक, सोने, शिसे, तांबे, मोलिबीडनम, मँगेनीझ अशा अनेक खनिजांसाठी त्यांनी सर्वे केले आणि अनेक मोठ्या साठ्यांचा शोध लावला. या काळात ते गाव वस्तींपासून दूर, तंबूत राहून, निसर्गाच्या सान्निध्यात कुटुंबासहित राहिले. त्यांची पत्नी श्रीमती सुनीता यांनीही अशा भारतातील दूरदूरच्या जागी अगदी जंगलातसुद्धा त्यांच्याबरोबर आनंदात राहून त्यांना मोठी साथ दिली.
प्रथम हैदराबादमध्ये आठ वर्षे, नंतर कोलकातामध्ये दोन वेळात मिळून आठ वर्षे, नागपूरमध्ये तेरा वर्षे व बंगलोरमध्ये दोन वर्षे राहून शरद गांवकर या विज्ञान क्षेत्रात विविध प्रदेशात काम करत होते.
आंध्रप्रदेश येथील खम्मम जिल्ह्यात त्यांनी केलेल्या कामामुळे मोठी कोळशाची खाणही सुरु झाली.
नागपूर येथे त्यांनी भूकंप वेधशाळा स्थापन केली. या वेधशाळेत सर्व जगातील भूकंप रेकॉर्ड होत आहेत.
कच्छ येथे झालेल्या २००१ मधील भीषण भूकंपाचा शरद गांवकर यांनी तीन महिने तेथे राहून अभ्यास केला व अनेक शोध निबंध प्रसिद्ध केले.
त्याचप्रमाणे अंदमान निकोबार येथे २००३ मध्ये जाऊन तेथे सर्वप्रथम अत्याधुनिक डिजिटल वेधशाळा स्थापन करून तेथील भूकंपांचा अभ्यास केला.
मुंबईला भूकंपापासून असणाऱ्या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी २००४-०५ मध्ये केलेल्या सेईसमिक मायक्रोझोनेशन अभ्यासाचे ते प्रमुख होते व त्यावर त्यांनी तयार केलेला अहवालही प्रसिद्ध झाला.
२००८-०९ या काळात Geological Survey of India च्या मरीन विंग तसेच एकूणच भूभौतिक प्रभागाचे ते प्रमुख होते. या काळात ते अंदमान निकोबार द्वीपसमुहातील बॅरन ज्वालामुखी बेटावर भूकंप अभ्यासासाठी उतरले होते.
२०१०-११ मध्ये शरद गांवकर बंगलोर येथे रिमोट सेन्सिंग आणि ऐरिअल सर्वे या प्रभागाचेही प्रमुख झाले व तेथे ऐरिअल सर्वेसाठी अनेक ऑल इंडिया प्रोजेक्ट्स त्यांनी सुरु केले.
जीएसआयमधील काळात ते तीन वेळा भारतीय डेलिगेशनचा भाग म्हणून परदेशात कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया येथे जाऊन त्यांनी अनेक नवीन भुवैज्ञनिक प्रकल्प आंतरराष्ट्रीय सहकार्याने भारतात सुरु केले.
शरद गांवकर सिनियर डेप्युटी डायरेक्टर जनरल या जीएसआयमधील अखिल भारतीय पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाच्या पदावरून बंगरुळु येथून ऑक्टोबर २०११ मध्ये निवृत्त झाले.
लगेच डिसेंबर २०११ मध्ये “साऊथ आशियन असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन (SAARC)” या भारताच्या शेजारी देशांसहित असलेल्या संस्थेच्या “दक्षिण आशियाला असलेला भूकंपाचा धोका आणि त्याचे निराकरण” या महत्वाच्या विषयावरील दिल्ली येथील कॉन्फरेंन्सचा चेअरमन म्हणून शरद गांवकर यांनी काम बघितले.
गुरुत्वाकर्षणीय लहरी या मूलभूत भौतिकीमधील संशोधनात “ इन्टर युनिव्हर्सिटी सेन्टर फॉर ऍस्ट्रॉनॉमि अँड ऍस्ट्रॉफीजीक्स (IUCAA)”, पुणे या सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबर जानेवारी २०१२ मध्ये काम करण्यास शरद गांवकर यांनी सुरुवात केली.
अल्बर्ट आईन्स्टाईन या महान वैज्ञानिकाने शंभर वर्षांपूर्वी गुरुत्वाकर्षणीय लहरी असू शकण्यासंबंधीचा भूभौतिकीय गणिती शोध लावला होता. परंतु आतापर्यंत या लहरी शोधल्या गेल्या नव्हत्या. त्यासाठी U.S.A. मध्ये गुरुत्वाकर्षणीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी दोन वेधशाळा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्थापन करण्यात आलेल्या आहेत. मार्च २०१२ मध्ये IUCAA, पुणे येथे झालेल्या महत्वाच्या इंटरनॅशनल मीटिंगमध्ये शरद गांवकर यांच्याकडे भारतात गुरुत्वाकर्षणीय लहरींचा अभ्यास करण्याकरिता वेधशाळा स्थापन करण्यासाठी जागा निवडण्याचे काम सोपविण्यात आले.
यासाठी शरद गांवकर यांनी संपूर्ण भारताचे उपग्रह, भुवैज्ञानिक, भूभौतिक, भूकंप, सेईसमिक झोनेशन, भौगोलिक नकाशे अभ्यासून त्यानंतर भारतातील अनेक राज्यांमधील तीस जागांना भेट दिली. यासाठी राजस्थान, मध्य प्रदेश ,छत्तीसगढ, महाराष्ट्र या प्रदेशांमध्ये ते अनेक वेळा गेले व तेथे अनेक प्रकारचे भौतिकी संशोधन केले.
शरद गांवकर यांनी निवडलेली जागा निश्चित झाली असून त्यावर गुरुत्वाकर्षणीय वेधशाळा उभारण्याचे काम लवकरच सुरु होईल. ही गुरुत्वाकर्षणीय लहरींचा अभ्यास करणारी वेधशाळा जगातील मोजक्या चार वेधशाळांपैकी एक असेल. गुरुत्वाकर्षणीय लहरींच्या शोधविषयक पहिल्या प्रबंधाचे शरद गांवकर हे इतर आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांबरोबर सहलेखक असून यासाठी डिसेंबर २०१६ मध्ये इतर आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांबरोबर त्यांना “ब्रेकथ्रू इन फिजिक्स” हे अतिशय मानाचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक व पदक मिळाले. त्याचप्रमाणे २०१६ चे गुरुत्वाकर्षणीय लहरींच्या शोधाकरिता International Gruber Cosmology Prize सुद्धा त्यांना इतर सहकाऱ्यांबरोबर मिळाले आहे.
संपूर्ण जीवन देशासाठी वाहून घेणाऱ्या थोर शास्त्रज्ञाला आम्हा समाजबांधवांचा लाख लाख सलाम!
-नरेंद्र हडकर